शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या पाठपुराव्याला यश ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक निर्णय

खेड ( चंद्रकांत बनकर): तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहिरवली ते करंबवणे या जगबुडी–वाशिष्टी खाडीवरील अत्यंत महत्त्वाच्या पुलाच्या मागणीला निर्णायक वळण मिळाले असून, या पुलासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे खाडीपट्टा विभागातील कुणबी समाज व मुस्लिम समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी खाडीपट्टा विभागातील सरपंच, विभागप्रमुख तसेच कुणबी समाज व मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहराज्यमंत्री तथा खेड–दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांची भेट घेऊन बहिरवली–करंबवणे पुलाची आग्रही मागणी मांडली होती. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास भाई कदम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली व या पुलाच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची उपयुक्तता व गरज लक्षात घेऊन संबंधित विभागाला पुलाचे सविस्तर अंदाजपत्रक व तांत्रिक प्रस्ताव तयार करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सध्या अधिकाऱ्यांकडून प्राथमिक चाचपणी व आवश्यक माहिती संकलनाचे काम सुरू झाले असून, अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे.
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग हा निसर्गसंपन्न, पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र भौगोलिक अडचणींमुळे या भागातील अनेक गावांना आजतागायत खेड मार्गे चिपळूण किंवा भरणे नाका मार्गे मोठा वळसा मारून प्रवास करावा लागत आहे.
बहिरवली–करंबवणे पूल झाल्यास खाडीपट्टा विभाग थेट चिपळूणशी जोडला जाणार असून, अनेक किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. यामुळे खेड व चिपळूण या दोन तालुक्यांमधील संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
या पुलामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. चिपळूणमार्गे दापोलीकडे जाणारे पर्यटक या नव्या मार्गाचा वापर करू शकतील, ज्यामुळे १०० किलोमीटरहून अधिक अंतर व मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे. परिणामी स्थानिक व्यवसाय, पर्यटनपूरक उद्योग व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.
या पुलाच्या माध्यमातून खाडीपट्टा विभागातील तसेच शेजारील पन्नासहून अधिक गावांचा आर्थिक, सामाजिक व पर्यटनात्मक विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खाडीपट्टा विभागातील तमाम जनतेने, विशेषतः या पुलासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कुणबी समाज व मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने, शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांचे विशेष आभार मानले आहेत.
दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार व्यक्त केले असून, हा पूल लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बहिरवली–करंबवणे पूल म्हणजे खाडीपट्ट्याच्या दळणवळण, पर्यटन आणि विकासाचा कणा ठरणार आहे.