मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. सरकारच्या वतीने विविध मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्या हस्ते पाण्याचा घोट घेतला.

या संपूर्ण घडामोडीवरून वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी समाजमाध्यमावरून प्रसाद लाड आणि सरकारवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. “प्रसाद लाड यांनी काल जरांगे-पाटील यांना पाणी देऊन त्यांचे उपोषण सोडवले, पण तिथे किती ‘पेढे’ वाटले गेले, हे कोणाला माहीत आहे का?” असा सवाल मोकळे यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केला आहे.

प्रसाद लाड यांनी सरकारच्या वतीने मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापूर्वी मागण्या पूर्ण करण्याचा शब्द त्यांनी दिला असून, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करण्याचेही आश्वासन देण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी पाण्याचा घोट घेतला.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी पाणी घेतल्याच्या या घटनेला राजकीय वर्तुळातून वेगवेगळे अर्थ लावले जात असताना सिद्धार्थ मोकळे यांनी ‘पेढे’ या शब्दाचा वापर करत सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेवर उपरोधिक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे मोकळे यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.