गुहागर : राजकीय अस्तित्व संपणार या भीतीपोटी आ. भास्कर जाधव हे भाजपवर टीका करत आहेत. गुहागर तालुक्यातील सर्वच अवैध व्यवसायांवर कारवाई झाल्यास कोणत्या पक्षाचे सर्वाधिक लोक यामध्ये गुंतले आहेत तेही समोर येतील अशा शब्दात जिल्हा भाजपा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी आ. जाधवांच्या आरोपांना उत्तर दिले. शृंगारतळी भाजपा मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शृंगारतळी येथील निळकंठेश्वर मंदिरात झालेल्या रामरक्षा महाआरती कार्यक्रमानंतर आ. जाधव यांनी भाजपमध्ये मटका कींग असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी शनिवारी निलेश सुर्वे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. सर्व टीकांचा समाचार घेतला. आ. जाधव त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाचा अजेंडा राबविताना एकिकडे रामरक्षा महाआरती म्हणत आहेत आणि दुसरीकडे भाजपवर आकसापोटी टीका करीत आहेत. शृंगारतळीत मटका, जुगार चालविणारे भाजपचे असल्याचा त्यांनी आरोप केला. मात्र, तालुक्यात या अवैध व्यवसायांबरोबरच वाळू माफिया, अवैध चिरेखाण, लाकूडतोड, उत्खनन यांना कोणाचे अभय आहे आणि यामध्ये कोणत्या पक्षाचे लोक गुंतले आहेत हे कारवाईनंतर समोर येतील, असे सुर्वे यांनी स्पष्ट केले.
पंचायत समितीमध्ये सर्वच पक्षांच्या सदस्यांना आम्ही सन्मानाची वागणूक देऊन निधीचे समान वाटप करत असताना पंचायत समिती कुणाच्या बापाची नाही असा आमच्यावर आ. जाधव यांनी आरोप केला मात्र, आम्ही त्यांचा बाप काढला तर चालेल का, असाही सवाल सुर्वे यांनी केला. स्वतः टीका करायची आणि दुसऱ्यांनी केली की आगपाखड करायची हा आ. जाधव यांचा स्वभाव असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला. गिमवी, देवघर परिसरातील
एमआयडीसी डाँ. नातू यांनी रद्द केलेली नाही. तेथील शेतकऱ्यांनी ग्रामसभांमध्ये ठराव करुन ते रद्दचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करुन आ. जाधव याप्रश्नी दिशाभूल करत असल्याचे सुर्वे यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील निरामय रुग्णालय सुरु करण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते धडपडत आहेत. मात्र, ते याप्रश्नी डाँ. नातू यांना दोष देत सुटले असून आ. जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून हे रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रयत्न केले असते तर आम्हाला आनंद झाला असता, असे सुर्वे म्हणाले.
आ. भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेचा निलेश सुर्वे यांनी घेतला समाचार.!
