राजापूर: गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथील सायबर वॉरियर क्लब आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या सायबर जागरूकता मोहिमेअंतर्गत राजापूर हायस्कूल, येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. राजापुरचीच विध्यार्थिनी स्वानंदी किरण शिवलकर हिने या कार्यक्रमात मार्गदर्शन केले या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे, सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ज्ञान देणे, तसेच जबाबदार आणि सजग डिजिटल नागरिक घडविणे हा होता.
विविध फसवणुकीच्या प्रकारांवर मार्गदर्शन
या कार्यक्रमात सायबर फसवणूक जागरुकता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सध्या वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ओटीपी फसवणूक, फिशिंग, सोशल मीडिया फसवणूक, गेमिंग फ्रॉड, बनावट लिंक, क्युआर कोड फसवणूक, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता आणि सुरक्षित ऑनलाईन व्यवहार, यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले. केवळ व्याख्यान न देता विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक सत्र आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना सावधगिरीचा सल्ला
कार्यक्रमात सायबर वॉरियर क्लबच्या सदस्य स्वानंदी शिवलकर हिने विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक सावधगिरीचे उपाय सांगितले. मजबूत पासवर्डचा वापर करणे, ओटीपी व वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर न करणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ४०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. डिजिटल युगात प्रत्येकाने सजग राहणे किती गरजेचे आहे हे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सायबर सुरक्षा शपथ घेत डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने, सुरक्षितपणे आणि सजगतेने वापर करण्याची प्रतिज्ञा केली.
ही मोहीम सायबर सुरक्षित भारत घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.