जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू असताना दापोली तालुक्यातील टाळसुरे गावात लोकशाहीचा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला. लग्नाच्या बोहल्यावर उभे राहण्याआधीच एका नववधूने मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीप्रती असलेली आपली निष्ठा अधोरेखित केली.
टाळसुरे येथील वृषाली राजेश चोगले या नववधूने आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसालाही मतदानाच्या कर्तव्यापेक्षा मोठे मानले नाही. सकाळी विवाहसोहळ्याची लगबग सुरू असतानाच वृषालीने वेळ काढत थेट मतदान केंद्र गाठले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपले मत नोंदवून तिने नागरिक म्हणून असलेली जबाबदारी पार पाडली.
मतदान केल्यानंतरच वृषाली लग्न मंडपाकडे रवाना झाली. “लग्न आयुष्यात एकदाच येते, पण लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे,” असा स्पष्ट संदेश तिने दिला. तिच्या या निर्णयाचे मतदान कर्मचारी, उपस्थित नागरिक तसेच गावकऱ्यांनी मनापासून कौतुक केले.
आज अनेक ठिकाणी मतदानाबाबत उदासीनता दिसून येत असताना वृषाली चोगले हिने दिलेला हा आदर्श विशेष ठरत आहे. वैयक्तिक आनंदापेक्षा लोकशाहीच्या हक्काला प्राधान्य देणारी ही घटना समाजासाठी, विशेषतः तरुण मतदारांसाठी, प्रेरणादायी संदेश देणारी आहे.