मुंबई : जनाब संजय राऊत, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह हे देशाचे लोहपुरुष आहेत तर तुमचे मालक उद्धव ठाकरे घरबसे पुरुष आहेत. घरात बसतात त्यांना सुरक्षेची गरज नसते. तुमच्या पक्षात आता रिक्षात बसण्याइतकेच खासदार उरलेत. त्यामुळे अमितभाईंच्या ताफ्यातल्या गाड्या मोजण्यापेक्षा आपल्या पक्षात उरलेले कार्यकर्ते, आमदार आणि खासदारांची संख्या मोजा आणि मग इतरांवर टीका करा, असा टोला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अमितभाई शाहांनी हिंमत दाखवत 370 कलम हटवले. काश्मीरमधील ज्या तरुणांच्या हातात दगड होते, त्या हातांना मोदी सरकारने काम दिले. आपल्या सैनिकांनी पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. काँग्रेस सरकार असताना मुंबईत रोज बॉम्बस्फोट होत होते. अमितभाई शाह केंद्रीय गृहमंत्री झाल्यापासून गेल्या 12 वर्षांत एकही बॉम्बस्फोट झालेला नाही. याला अमितभाईंचे कर्तृत्व आणि नेतृत्व म्हणतात. घरात बसून सरकार चालवणाऱ्यांनी लोहपुरुषांवर टीका करू नये, असे श्री. बन यांनी सुनावले.
श्री. बन पुढे म्हणाले की, तुमची श्रद्धा मात्र ना स्वातंत्र्यवीर सावरकरांवर, ना छत्रपती शिवाजी महाराजांवर. तुमची श्रद्धा राहुल गांधी आणि औरंगजेबाच्या चरणावर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सच्चे भक्त असलेले अमितभाई शाह स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेत देश मजबूत करण्याचे काम करताहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य पूर्ण वाचले आहे. तुम्ही मात्र औरंगजेब आणि राहुल गांधींचे साहित्य वाचण्यात मग्न आहात. दिमागी नक्षल होऊन तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात. पण संपूर्ण भारत नक्षलवादमुक्त केला, तसा तुमच्यासारख्या दिमागी नक्षलींचा इलाज कायदेशीर मार्गाने करण्यात अमितभाई शाह तरबेज आहेत.
अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला सरकार तयार आहे. मराठा समाजाचे सर्वाधिक हित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जपले. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला दिलेले 14 टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाचे आरक्षण टिकवले असते तर आज मराठा बांधवांवर आंदोलन करण्याची वेळच आली नसती. उद्धव ठाकरेंना मराठा समाजाचे आरक्षण का टिकविता आले नाही याचे उत्तर संजय राऊतांनी आधी मराठा समाजाला आणि महाराष्ट्राला द्यावे, असेही श्री. बन यांनी सांगितले.