लांजा : सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदांच्या आरक्षण निश्चितीसाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १२ जून रोजी या ग्रामसभांमधून प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सन २०२४, २०२५ व २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, मुंबई ग्रामपंचायत नियम, १९६६ मधील सुधारित तरतुदींनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीतील प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया विशेष ग्रामसभांद्वारे पार पाडण्यात येणार आहे.
या अंतर्गत बेनीखुर्द, जावडे, पालू, वाघणगाव, आंजणारी, माजळ, वनगुळे, आसगे, विवली, कणगवली, साटवली, भांबेड, पन्हळे, इंदवटी, कोल्हेवाडी, खोरनिनको, गोळवशी, मठ, शिपोशी आणि कुरंग या ग्रामपंचायतींमध्ये सकाळी १० वाजता विशेष ग्रामसभा होणार आहे. तर रावारी, वाडगाव, इसवली, विलवडे, आडवली आणि हर्दखळे या ग्रामपंचायतींमध्ये दुपारी ३ वाजता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.
आरक्षण सोडतीनंतर संबंधित ग्रामपंचायतींमधील निवडणूक समीकरणे स्पष्ट होण्यास मदत होणार असून इच्छुक उमेदवार, स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. त्यामुळे १२ जून रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.