मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यापेक्षा संजय राऊत यांनी ते ज्या औरंगजेबाचा वैचारिक वारसा चालवताहेत त्या औरंजेबाचा इतिहास सांगायला हवा. शिवाजी महाराजांचा इतिहास हा स्वाभिमानाचा आणि विचार हिंदुत्वाचे होते.
तुमचा इतिहास हा औरंगजेबाच्या चरणावर आपला पक्ष अर्पण करण्याचा आणि अफझलखानाच्या कबरीवर माथा टेकण्याचा आहे. सातत्याने औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याने तुम्हाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते श्री. नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे साठ वर्षे टिकलेली मूळ शिवसेना ही एकनाथजी शिंदेंसोबत आहे. कारण ते बाळासाहेब ठाकरेंचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानतात. तुमच्यासारखे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून औरंगजेबाचा उदो उदो करत नाहीत, राम मंदिरांवर टीका करत नाहीत. आज मूळ शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, उबाठा गटाचा नव्हे. उबाठा गटाचा वर्धापन दिन उबाठा गट स्थापन झाला त्यादिवशी असल्याने संजय राऊतांनी एकदा उबाठा गटाची कुंडली शोधावी. मूळ शिवसेनेवर महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. त्या जन्मकुंडलीत राहुल गांधी हे सर्वात मोठे शिलेदार असल्याने राहुल गांधींना विचारून उबाठाने आपला वर्धापन दिन साजरा करावा, असे श्री. बन यांनी सुचवले.
सगळ्यात मोठा बाजार 2019 साली संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी मांडला होता. बाजारात उभे राहून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी अख्खा पक्ष, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्व आणि साठ वर्षांची शिवसेना विकून टाकली. आपण स्वतः आपल्या पक्षाचा लिलाव करायचा आणि विचारांना विकले गेले म्हणायचे, हे धंदे संजय राऊतांनी बंद करावेत. आपल्या पक्षाचा लिलाव करताना किती कोटी घेतले होते, याचे उत्तर आधी संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावे, असे श्री. बन यांनी सुनावले.
