लातूर : आज लातूर तालुक्यातील करकट्टा व माटेफळ येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते व लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांनी पावसाअभावी नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली.
पावसाचा खंड पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मागील वर्षी झालेल्या नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याची व्यथा मांडली. यंदाही पिकांची परिस्थिती चिंताजनक असून शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
परिस्थितीला कुठलेही नाव द्या; मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, हीच शेतकऱ्यांची शासनाकडे रास्त मागणी आहे.
नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना योग्य, सरसकट आणि तात्काळ आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. शासनाने कागदी घोषणांऐवजी प्रत्यक्ष मदतीसाठी तातडीने पावले उचलावीत.