पुणे – पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. शीतल तेली-उगले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनासह सर्व विभागांनी चांगली तयारी केली आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वे, बस तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिक पुण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक रेल्वेगाडीनंतर मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडतील. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. यासाठी त्या – त्या दिवशी आणि गर्दीच्या वेळेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.

गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही कार्यक्रमांना हजारो नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी वाहतूक व गर्दीचे स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक आहे. वाहतुकीतील बदल, पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था तसेच गर्दीच्या ठिकाणांची माहिती नागरिकांना वेळेत द्यावी, अशा सूचनाही सुनेत्रा पवार यांनी केल्या.

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वाचा उत्सव असून देशभरातून नागरिक तो पाहण्यासाठी येतात. त्यामुळे महिला, बालके आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी मंगळसूत्र चोरी, पाकीटमारी यांसारख्या घटना टाळण्यासाठी पोलिसांची २४ तास गस्त आणि प्रभावी बंदोबस्त ठेवावा, असे निर्देशही सुनेत्रा पवार यांनी दिले.

मागील वर्षीच्या अनुभवातून आलेल्या अडचणींचा आढावा घेऊन यावर्षी आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरण राहील असे पाहावे असेही सांगितले.

गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात वीजपुरवठा अखंडित राहील, याकडे संबंधित यंत्रणांनी बारकाईने लक्ष द्यावे, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

गणेश विसर्जनाच्या दिवशी विविध विसर्जनस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता विचारात घेत विसर्जन कुंड तसेच अन्य निर्धारित ठिकाणी आवश्यक प्रकाशव्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी. विसर्जन होत असतानाच संबंधित ठिकाणी सातत्याने स्वच्छता करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव हा सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने साजरा करण्याचा उत्सव आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. या परंपरेला साजेसे असे वातावरण निर्माण करून सर्वांनी शांततेत, उत्साहात आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, पारंपरिक पद्धतीला प्राधान्य राहील आणि उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन केले जाईल, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात साजरा करूया, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.