मुंबई : धर्मांध आक्रमकांचा उदोउदो करण्याची सवय जडलेल्या आणि मुस्लीमांचे तुष्टीकरण करणा-या संजय राऊतांनी जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाबद्दल चकार शब्द काढला नाही. अल्पसंख्याकांचे लांगुलचालन आणि त्याआडून हिंदू अस्मितेवर घाला घालण्याचे हीन राजकारण राऊत, उबाठा गट, काँग्रेसकडून वारंवार होत असल्याचा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेकाचा दाखला देत आव्हाडांनी केलेले वक्तव्य चीड आणणारे असून त्या वक्तव्यावर राऊत, उबाठा गट मूग गिळून गप्प बसतात हे निषेधार्ह आहे असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी श्री. बन म्हणाले की, आव्हाडांची हिंदू योद्ध्यांचा अवमान करण्याची जुनी खोड आहे. याआधीही औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते असे म्हणत आव्हाडांनी छत्रपती शिवरायांसारख्या शूर राजांना नगण्य स्थान देत मोगलांचा इतिहास अधोरेखित करण्याचा हीन प्रयत्न केला होता. मुस्लीम तुष्टीकरणासाठी, मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आव्हाडांनी इतिहासाचे विकृतीकरण करत योद्ध्यांचा वारंवार अपमान केला पण राऊत, उबाठा गट त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत नाहीत. मात्र शिवाजी महाराजांचे मावळे हे सूज्ञ असून अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाहीत असे श्री. बन यांनी खडसावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आखाती देशातील युद्धाच्या स्थितीतही भारतामध्ये एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. सोमवारी तीन जहाजे तर मंगळवारी आणखी एक जहाज पोहोचले असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. या बिकट परिस्थितीतही काँग्रेस, समाजवादी पार्टीचे घाणेरडे राजकारण सुरू असून काही ठिकाणी जाणीवपूर्वक गॅस सिलेंडरची साठेबाजी आणि काळाबाजार त्यांच्याकडून सुरू आहे. या साठेबाजांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगाण्याचे काम देखील सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग पूर्णपणे सुरळीत नक्की होईल. मुंबईमध्ये गॅस पुरवठा सुरळीत असून ग्रामीण भागात हा पुरवठा थोडा विस्कळीत झाला आहे. तो ही सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन यशस्वी झाले आणि विरोधक मात्र गारद झाले आहेत अशी खिल्लीही श्री. बन यांनी उडवली.
युद्धातही पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेले नाहीत
इराण आणि इस्रायल युद्धाचा संपूर्ण जगाला फटका बसला असून अनेक देशांत इंधन, कच्च्या तेलाच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. भारत हा एकमेव देश असा आहे की जिथे युद्धाच्या झळा बसूनही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत. पाकप्रेमी राऊतांनी पाकिस्तानमध्ये साडेतीनशे रुपये प्रति लिटर डिझेल आणि पेट्रोलचा भाव झालाय हे पहावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे खमके नेतृत्व भारताला लाभल्याने आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत याकडे लक्ष द्यावे असा खोचक सल्ला श्री. बन यांनी दिला.
श्री. बन म्हणाले की, मराठवाडा, विदर्भावर सर्वाधिक अन्याय महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसच्या काळात झाला होता. त्यावेळी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक मंडळे गुंडाळून ठेवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केले होते. निधीच्या समानवाटपावरून भाजपा महायुती सरकारवर कोरडे ओढणा-या राऊतांना लक्ष्य करत श्री. बन म्हणाले की, अडीच वर्षांचे मविआ सरकार असताना भाजपाच्या 105 आमदारांना कवडीचाही निधी दिला गेला नव्हता. सोईस्कर विस्मरण होणा-या राऊतांना आठवण करून देत श्री. बन म्हणाले की भाजपाच्या 12 आमदारांचे असंवैधानिकपणे निलंबन करण्याचे काम मविआ सरकारने केले होते हे जनता विसरलेली नाही. विधानसभा आणि लोकसभेचे अध्यक्ष निश्चितपणे निष्पक्ष असायला हवे असे उच्चरवात बोलणा-या राऊतांना भाजपाचे 12 आमदार विधानसभेतून भास्कर जाधव यांनी निलंबित केले होते तेव्हा जाधवांचा कारभार निष्पक्ष वाटला का असा खोचक सवाल त्यांनी केला.
छत्रपती शिवरायांच्या अपमानावर संजय राऊत गप्प का ,भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा सवाल
