चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील महत्त्वाच्या दळणवळणाच्या प्रश्नांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून, केंद्रिय मार्ग निधी (CRF) अंतर्गत तीन पुलांच्या बांधकामासाठी एकूण २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथील रा.मा. १६६ वांझोळे–कासार कोळवण–बोंड्ये ते रा.मा. १७४ या मार्गावरील बावनदीवरील मोठा पूल अतिवृष्टीत वाहून गेल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पुलाच्या बांधकामासाठी ६.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील दळणवळण सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.
त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले येथील प्र.जि.मा. ४६ ते हेदली-अणदेरी-कारभाटले प्र.जि.मा. ४७ या मार्गावर कि.मी. ०/९०० येथे शास्त्री नदीवर ७२ मीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी ६.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील गावांमधील अंतर कमी होऊन नागरिकांची पायपीट मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी आता पूर्णत्वास जाणार आहे.
तसेच चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथील खांदाट–दळवटणे–मोरवणे मार्गावरील प्र.जि.मा. २७ कि.मी. १/०० येथील मोठ्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे स्थानिकांसाठी सुरक्षित आणि अखंड वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
या तिन्ही कामांसाठी संबंधित गावांतील नागरिकांनी दिलेल्या निवेदनांचा सखोल अभ्यास करून आमदार शेखर निकम यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच अधिवेशनात वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून या कामांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच एकूण २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊ शकला आहे.
निधी मंजूर झाल्यानंतर आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. तसेच दिवंगत अजित पवार यांना अभिवादन करून त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
