खेड (प्रतिनिधी) : – मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगदा पार केल्यानंतर रायगड जिल्ह्यातील भोगाव गावाजवळ ॲक्टिव्हा दुचाकीचा अपघात होऊन दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या अपघातात अमेय सचिन गायकवाड (वय २९, रा. वावे, गायकवाडवाडी) आणि मनीष दत्ताराम मांजरेकर (वय ३२, रा. रत्नागिरी) हे दोघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०१ एफएम ३७८७ क्रमांकाची ॲक्टिव्हा दुचाकी घेऊन दोघेजण मुंबईहून खेडकडे येत होते. सोमवारी (दि. १८ मे २०२६) मध्यरात्री सुमारे २.१२ वाजण्याच्या सुमारास कशेडी बोगद्यानजीक भोगाव गावाजवळ दुचाकीस्वाराचे झोपेच्या भरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच नरेंद्राचार्य नाणीजधाम २४ तास रुग्णवाहिकेचे चालक सुरेंद्र हंबीर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कळंबणी बुद्रुक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.