मुंबई : पावसाळ्यात पूर परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महापालिका, बेस्ट आणि, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे यांनी इंटिग्रेटेड प्लँन तयार करुन समन्वयाने काम करा, अशा सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी केल्या आहेत.

मुंबईतील रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या नालेसफाईच्या कामाचा व मान्सून पुर्व कामाचा आढावा घेण्यासाठी दि. 12 जून रोजी मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात समन्वय बैठक घेतली. या बैठकीला मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक हिरेश मिणा, पश्चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक पंकज सिंग यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगराचे जिल्हाधिकारी, महापालिका, रेल्वे, फायर ब्रिगेडचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पश्चिम रेल्वेने सांगितले की, पाण्याचा निचरा करण्यासाठी चर्चगेट ते विरार या दरम्यान एकुण 15 मायक्रो टनेल रेल्वे ट्रँक खालून करण्यात आले असून या वर्षात 4 मायक्रो टनेल पूर्ण करण्यात आले आहे. तर पाणी उपसण्यासाठी पंपांची संख्या वाढवून यावेळी 126 पंप बसवण्यात आले आहेत तर 2400 व्हँगन इतका गाळ काढण्यात आला आहे. तर मध्य रेल्वेच्या मार्गावर ही पंपाची संख्या वाढवण्यात आली असून 220 पंप बसवण्यात आले आहेत. 350 किलो मिटर लांबीच्या मार्गावरील 160 नाले व गटारांची सफाई करण्यात आली आहे. दोन्ही मार्गावर सीसीटीव्ही कँमेरे आणि पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. यावेळी कांजूर मार्ग येथील उषा नगर नाला आणि कुर्ला येथील ब्राम्हणवाडी नाल्याच्या खोली करण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आल्याने पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.