मुंबई : जनाब संजय राऊत, हिंदुत्ववादासाठी राबणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस आणि मोहनजी भागवत यांना रामरक्षा आंदोलनाचे निमंत्रण पाठवण्याआधी आपण स्वत: हिंदुत्व का सोडले आणि आता प्रभू रामचंद्रांची आठवण का काढतोय याचे थोडे आत्मपरीक्षण करा. सध्या नागपूरमध्ये असलेले संजय राऊत तेथे दारोदारी फिरताहेत. संघ स्थानावर जायला मात्र त्यांच्याकडे वेळ नाही. हिंदुत्ववादाशी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करण्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी एकदा संघस्थानावर जाऊन नाक घासत माफी मागितली तरच या महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जनता उद्धव ठाकरेंना माफ करेल आणि भाजपाही रामरक्षा आंदोलनात सहभागी होईल, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देवाभाऊंनी दिल्लीत जावे म्हणजे महाराष्ट्रात धुडगूस घालायला आम्ही मोकळे, अशी तुमची कितीही इच्छा असली तसे होणार नाही. अडीच वर्षे सरकार असताना महाराष्ट्राला मागे नेण्याचे काम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केल्याने आधी महाराष्ट्राची प्रगती होऊ द्या. महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य झाले की देवाभाऊ योग्यवेळी राष्ट्राची सेवा करण्यासाठी जातील. त्याबद्दल संजय राऊत यांनी सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभाऊंना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे आणि 2029 ची निवडणूकही आम्ही देवाभाऊंच्या नेतृत्वातच लढणार आहोत, असे श्री. बन यांनी सांगितले.
श्री. बन पुढे म्हणाले, भाजपा आणि महायुतीच्या भीतीमुळे आणि संपत आलेल्या आपल्या दोन्ही पक्षांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे यासाठी ठाकरे बंधू पुन्हा पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करताहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कोरडा पाठिंबा देण्यापेक्षा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी दिल्लीत जाऊन आठ – दहा दिवस कडक उपोषण करावे. मग कदाचित त्यांच्या मागण्याचा विचार होत विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडू शकते. महाराष्ट्रात रोज उठून पत्रकार परिषद घेण्यापेक्षा संजय राऊत यांनी उपोषण करावे. त्यामुळे महाराष्ट्राला जरा शांतता मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 140 कोटी जनता एकत्रित आहे. हे आंदोलन काय आणि कसे आहे हे देशातील जनतेला पूर्ण ठाऊक असल्याने त्यांनी कितीही प्रयत्न केले तर त्याने काहीही फरक पडणार नाही.
केंद्रात आणि राज्यात लवकरच काही बदल होतील, अशी सूत्रांची माहिती नेहमीच येत असते. पण लक्षात घ्या, दिल्लीत स्थिर सरकार आहे. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी सुप्रियाताई सुळे यांनीही संकेत दिले आहेत. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकही मंजूर होईल. राज्यामध्ये तर दोन तृतीयांश बहुमत असल्याने तुम्हाला अपेक्षित असलेला कुठलाही भूकंप ना केंद्रात होणार ना राज्यात, असे श्री. बन यांनी स्पष्ट केले.