पुणे : ज्यांच्याकडे विद्वत्ता आणि कर्तृत्व आहे,त्यांनी अधिकाधिक नम्र व्हायला हवे,तर जे नम्र आहेत त्यांनी अधिकाधिक कर्तृत्व गाजवण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे.एकूणच समाजात आज विद्वत्ता आणि नम्रता यांचा संगम होण्याची गरज आहे.आज ज्या समाजगुरुंचा सन्मान करण्यात आला, त्यांच्या ठायी हा संगम झालेला दिसून येतो,असे मत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले
विद्या प्रबोधिनी आणि पुनर्निर्माण सोशल फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समाजगुरुंच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ना. पाटील बोलत होते.

यावेळी प्रास्ताविकात जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी विविध क्षेत्रातील समाजगुरुंचा परिचय करून दिला. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ आणि नोबेल पुरस्काराचे सहमानकरी डॉ. राजेंद्र शेंडे, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन, निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. राजेंद्र निंभोरकर, पुणे सार्वजनिक सभेचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद नवरे,लेखक व संपादक आनंद हर्डीकर, लेखिका आणि अनुवादक मृणालिनी सावंत, प्रसिद्ध गायक आणि दिग्दर्शक आनंद माडगूळकर, प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे, जगातील सर्व सात खंडांमधील सर्वोच्च शिखरे सर करणारे विक्रमवीर शरद कुलकर्णी,ग्रंथप्रसारक आणि रुरल रिलेशन्सचे प्रमुख प्रदीप लोखंडे, इतिहास संशोधक अनुराधा कुलकर्णी यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन प्रमुख अतिथी चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
त्यानंतर डॉ. राजेंद्र शेंडे आणि आनंद माडगूळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्याचे शिक्षणमंत्री स्वतःहून दरवर्षी विविध क्षेत्रातील समाजगुरुंचा आवर्जून सन्मान करतात, याबद्दलचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी शेवटी आभार मानले,तर अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले.