गुहागर : कोकणवासीयांना आणि पर्यटकांना कोकणच्या समुद्रकिनारी भागात प्रवास करताना अनेकदा फेरीबोटीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी विविध खाड्यांवर सागरी पूल उभारण्याचे काम सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर जयगड खाडीवरील गुहागर तालुक्यातील तवसाळ आणि रत्नागिरी परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तब्बल ७१५ कोटी रुपये खर्च करून हा भव्य केबल-स्टेड पूल उभारला जात आहे.

सुमारे २.९ किलोमीटर लांबीचा हा पूल पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूल पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी आणि गुहागर या भागांतील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठी सुविधा मिळणार आहे.

विशेष म्हणजे, पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्गाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे जयगड खाडीचे विहंगम आणि नयनरम्य दृश्य पर्यटकांना पुलावरून अनुभवता येणार आहे. या भव्य प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.