मुंबई : राजकीय आंदोलनातून दाखल झालेल्या खटल्यांचा दाखला देत मनसेचा प्रवक्ता गजानन काळे याने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आणि खोडसाळ आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. महिलांनी केलेल्या आरोपामुळे ज्याचे तोंड काळे झालेले आहे त्याच्याच तोंडावर ही थुंकी उडाल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रविंद्रजी चव्हाण कल्याण – डोंबिवलीत काय काम करतात, हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. राजकीय आंदोलनातून त्यांच्यावर दाखल झालेल्या सर्व आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ते स्पष्टही झाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांवर जनतेसाठी संघर्ष, आंदोलन केल्यासंदर्भातील गुन्हे दाखल आहेत. गजानन काळेवर मात्र अनेक महिलांनी वेगवेगळे आरोप केलेत आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. रविंद्र चव्हाण अनेकदा जनतेमधून निवडून येत आहेत. तुम्हाला, तुमच्या मालकाला, तुमच्या मालकाच्या मुलाला एकदाही जनतेमधून निवडून येता आले नाही. आधी आपल्या पक्षाचे बंद झालेले दुकान बघा आणि मग भाजपावर टीका करा. तुमच्यासारखे महिलांना छेडल्याचे, खंडणी वसूल केल्याचे गुन्हे रविंद्र चव्हाणांवर दाखल नाहीत. आपले काळे तोंड आधी आरशात बघा आणि मग इतरांवर टीका करा, असा प्रहार श्री. बन यांनी केला.
देवाभाऊंचा “कॉम्प्लान बॉय” असणे हा माझ्यासाठी अभिमान असल्याचे सांगून श्री. बन म्हणाले असंस्कारी आणि अत्याचारी बॉय असण्यापेक्षा देवाभाऊंचा ”कॉम्प्लान बॉय” असणे कधीही चांगले. मी जनतेमधून निवडून आलो. तुमच्यासारखे खंडणीवसूली, महिलांना छेडण्याचे, अत्याचार करण्याचे धंदे करत नाही. गजानन काळे हा अत्याचारी बॉय, महिलांना छेडणारा बॉय आहे. हा त्याचा इतिहास आहे.
श्री. बन पुढे म्हणाले, घोकमपट्टी कोण करतोय आणि भाषण कोण विसरतेय, हा इतिहास महाराष्ट्राने पाहिलाय. गजानन काळेच्या माध्यमातून मनसे आणि अमित ठाकरेंना आव्हान आहे, हिंमत असेल तर अमित ठाकरे यांनी स्थळ, वेळ विषय ठरवावा. कुठल्याही मुद्द्यावर कुठलेही पुस्तक हातात न घेता, एकही कागद हातात न घेता मी अमित ठाकरेंसोबत चर्चा करायला तयार आहे. त्यावेळी कोण चतुर्लिंगम आहे आणि कोण रांचो आहे, याचा निकाल लोक ठरवतील. ज्या अमित ठाकरेंना चार लोकांमध्ये उभे राहून भाषण करता येत नाही, भाषण विसरतात, त्या मनसेने भाजपाला आव्हान देऊ नये. भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ताही अमित ठाकरेंसोबत कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. तेव्हा गझनी कोण आहे आणि रजनीकांत कोण आहे, हे सिद्ध होईल.
राज ठाकरे आणि मनसेचे दुकान बंद करण्याचे काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलेय. राज ठाकरे यांच्या भूमिका काय आहेत? यांना दहीहंडीपेक्षा मटण हंडी प्रिय आहेत. आपले रेल्वे इंजिन हे ट्रॅकच्या बाहेर घसरलेय. गजानन काळे, दादरमध्ये आपल्या मालकाच्या मुलाचे डिपॉझिट जप्त झाले, याला दुकान बंद होणे म्हणतात. अनेक महापालिकांमध्ये तुम्हाला भोपळा फोडता आला नाही, याला दुकान बंद होणे म्हणतात, अशा शब्दात श्री. बन यांनी खरडपट्टी काढली.
रविंद्र चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
