मुंबई : वंचित बहुजन आघाडीने शनिवारी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘जय भीम Gen Z’ या नव्या उपक्रमाचा टीझर प्रसिद्ध केला. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या दिशेने वंचित बहुजन आघाडीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

टीझरसह प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या Gen Z सोबत संवाद साधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची टाउनहॉल मालिका.” या उपक्रमाबाबत टीझरमध्ये अधिक माहिती देण्यात आलेली नसून, “लवकरच येत आहे”असे त्यात म्हटले आहे.

टाउनहॉल म्हणजे राजकीय नेते आणि जनतेमधील थेट संवादासाठी आयोजित करण्यात येणारी खुली सार्वजनिक बैठक. अशा बैठकीत नागरिक आपला प्रश्न थेट नेत्यांसमोर मांडू शकतात आणि त्यांच्याकडून उत्तरे मिळवू शकतात. नव्या उपक्रमाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीकडून Gen Z सोबत राजकारण, शिक्षण, सामाजिक न्याय आणि व्यापक फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेसह संबंधित मुद्द्यांवर थेट संवाद साधण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

भारताच्या लोकसंख्येतील एक चतुर्थांशपेक्षा अधिक वाटा Gen Z चा असल्याने हा वर्ग भविष्यातील राजकारणातील एक महत्त्वाचा मतदार आणि सामाजिक घटक म्हणून पुढे येत आहे. राजकीय मुद्द्यांकडे पाहण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची पद्धतही ही पिढी बदलत आहे. अशा परिस्थितीत, तरुणांशी थेट आणि संवादात्मक पद्धतीने जोडण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरू शकतो. विशेषतः तरुणांचा राजकीय आवाज दिवसेंदिवस बुलंद होत असताना, Gen Z पर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ही रणनीती वंचित बहुजन आघाडीसाठी महत्त्वाची ठरू शकते.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी सांगितले की, या उपक्रमा मागील उद्देश तरुणांचे प्रश्न, चिंता आणि आकांक्षा थेट ऐकून घेणे हा आहे.

“आम्हाला Gen Z चा आवाज ऐकायचा आहे. वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केला आहे. अगदी अलीकडेच, MAHA-TET पेपरफुटीप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करताना आमच्या विद्यार्थी संघटनेने, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने, शिक्षणमंत्री दादा भुसे यांना उत्तरदायित्व स्वीकारण्यास भाग पाडले.”

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पक्षाने अलीकडच्या काळात केलेल्या आंदोलनांशी या उपक्रमाची सांगड घालत त्या पुढे म्हणाल्या, “दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज करून त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि तो यशस्वी ठरला.”

विद्यार्थी आंदोलनांची वाढती तीव्रता आणि तरुणांशी जोडले जाण्यासाठी विविध राजकीय संघटनांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ‘जय भीम Gen Z’ या उपक्रमाकडे पाहता येते. पारंपरिक राजकीय प्रचार आणि संदेशवहनापलीकडे जाऊन तरुणांशी थेट संवाद साधण्याची संधी या टाउनहॉलच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला मिळू शकते. तसेच, तरुणांच्या दैनंदिन आयुष्याशी आणि भविष्यातील आकांक्षांशी संबंधित मुद्द्यांवर त्यांच्याशी थेट चर्चा करण्याचे व्यासपीठही या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते.

या उपक्रमाची ठिकाणे, तारखा आणि सहभागी होणाऱ्या व्यक्तींबाबतची अधिक माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.