मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी झटत असताना भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपला जास्तीतजास्त वेळ पक्षकार्याला देत क्रियाशीलता दाखवावी, असे आवाहन भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. पुणे येथे सोमवारी गणेश कला क्रीडा मंडळात आयोजित करण्यात आलेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील पक्षाचे सर्व मंत्री, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, राज्यभरातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण म्हणाले, भाजपाने राज्यभरात कार्यकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. राज्य आणि केंद्र सरकारच्या उपलब्धी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्याने काही वक्ते तयार करता येतील का हे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते खंबीरपणे मागील निवडणुका लढल्याने भाजपाला राज्यभरात घवघवीत यश मिळाले. त्यामुळे राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींपैकी 8 ते 10 हजार ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे सरपंच आहेत. एवढी मोठी ताकद आणि क्षमता राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून चालणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
येत्या काळात राज्यातील युवकांना नशेपासून मुक्त करण्यासाठी या बैठकीच्या निमित्ताने पाऊल उचलले तर महाराष्ट्र भाजपा कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी लक्षात ठेवेल. राज्यातील 1 लाख 56 हजार बूथवर कार्यकर्ते तयार व्हायला हवेत आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्यावर कोणती ना कोणती जबाबदारी द्यायला हवी. आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद, महापालिका, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य अशा पदाधिकाऱ्यांपासून पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या सर्व कामात सहभागी सहभागी असला पाहिजे, अशी अपेक्षा श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.
दीप प्रज्वलनानंतर भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष धीरज घाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचे स्वागत केले तर प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले.
विकसित महाराष्ट्रासाठी प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने क्रियाशील व्हावे; भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन…
