मुंबई : पॅरोल आणि फरलोबाबत मुख्यमंत्री यांनी काही नियम बदलले आहेत. या भ्रष्ट व्यवस्थेबाबत कोणी बोलणार आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी यावर काही बोलणार का? बलात्काराच्या आरोपीला पॅरोल मिळू देणार नाही, असे मुख्यमंत्री सांगतात. मात्र संबंधित कायद्यात तशी तरतूद असतानाही खोटी विधाने केली जात आहेत.लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला बाहेर जाता येणार नाही, असे असताना कोर्टदेखील काही मर्यादा असल्याचे सांगते.

मुख्यमंत्री यांनी भावनिक बोलणे बंद करावे. त्यांनी भावनिक नव्हे, तर कायदेशीर भाष्य केले पाहिजे. शक्ती कायद्याबाबत बोलले जात आहे. हा कायदा भावनाशीलतेच्या आधारावर तयार करण्यात आला होता. मात्र राष्ट्रपतींनी तो परत पाठवल्याने आता हा कायदा लागू होऊ शकलेला नाही. कायदे अधिक कडक असते, तर असे गुन्हे घडले नसते. पोलिस यंत्रणेचा वापर राजकीय लोकांसाठी केला जात असल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल माझे कोणतेही मत नाही. ते माझे मित्र आहेत. ते मला चहासाठी बोलावतात आणि आमचे नेहमी फोनवर बोलणे होते. जर आरोपीला शिक्षा द्यायचीच असेल, तर बलात्काराच्या प्रकरणाचा निकाल एका महिन्याच्या आत लागू शकतो. बदलापूर प्रकरणाचे पुढे काय झाले? त्या प्रकरणात कोर्टानेही फटकारले होते. एकूणच ती संस्था भाजपच्या जवळची व्यक्ती चालवत होती. आरोपीला शिक्षा देताना कोणतीही दिरंगाई होता कामा नये.