मुंबई : दिवंगत अजित दादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एफआयआर दाखल करायला रोहितला काँग्रेस सरकारकडे जावं लागलं. त्यामुळे ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला, हा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, संसदेच्या दोन्ही सभागृहात आमच्या पक्षाच्या वतीने अजित दादांच्या अपघाताच्या चौकशीसंदर्भात मुद्दा मांडला; परंतु आम्हाला जी अपेक्षा होती की त्या विषयावर विधानसभेमध्ये चर्चा व्हावी, ती झाली नाही. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांची पहिल्यापासून भूमिका आणि भावना राहिलेली आहे. जर निवडणूक झाली, तर आम्ही उमेदवार देणार नाही, हे आम्ही पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं होतं, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, अजित दादा पालकमंत्री असताना उन्हाळ्याच्या आधी पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी आम्ही बैठक घ्यायचो. याही वेळी प्रशासनाने जातीने लक्ष घालून लोकांना पाण्यासंदर्भात कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, शहरात नालेसफाईसाठी एवढा निधी दिला जातो; त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होते आहे की नाही, हे पाहिलं पाहिजे आणि पावसाळ्यात पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा यासाठी प्रशासनाने योग्य तयारी केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, या देशातील सामाजिक परिवर्तनाला महाराष्ट्राने नेहमीच दिशा दिली आहे. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. परंतु काही लोकांच्या घाणेरड्या आणि गलिच्छ कृत्यांमुळे महाराष्ट्राचे नाव देशात खराब होत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला मी हात जोडून विनंती करते की, हे बुवाबाजी करणारे भोंदू, अन्याय करणारे आणि तुम्हाला भीती दाखवणारे कोणतेही व्यक्ती असतील, तर तुम्ही आम्हा प्रतिनिधींशी संपर्क करा. आपण सगळ्यांनी मिळून बुवाबाजी आणि भोंदूगिरी मोडून काढण्याची वेळ आली आहे, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
