ठाणे : दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना जलतरणाचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दिव्यात अनोखे ‘गटर पूजन’ आंदोलन करण्यात आले.

कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत व कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे आणि दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

दिवा परिसरातील अनेक नाले व गटारांची सफाई अद्याप अर्धवट अवस्थेत असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दिवा शहरातील नालेसफाईसाठी सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित कामे झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.