मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा अधिक काळ पंतप्रधानपद भूषविण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. संजय राऊत सल्ला देत आहेत की पंतप्रधान मोदीजींनी केदारनाथला जाऊन आत्मचिंतन करावे. पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी केदारनाथचा आदर करत असल्याने तिथे जाऊन ते आत्मचिंतनही करतात.

मात्र संजय राऊत आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी केदारनाथऐवजी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन करावे. कारण त्यांना औरंगजेबाचा उदोउदो करणे एवढेच जमते, अशी घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केली. मुंबई प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून संजय राऊत आक्षेप घेत आहेत. पाच वर्षांपासून रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेणाऱ्या संजय राऊतांनी नेमके काय दिवे लावलेत, हे एकदा महाराष्ट्राला सांगावे असे सुनावत श्री. बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे नेतृत्व देशातील १४० कोटी जनतेने मान्य केले आहे. सातत्याने जनतेशी संपर्क, जनतेची सेवा करणे हे आपले कर्तव्य समजत असल्यानेच ३७० कलम हटवण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाली. तिहेरी तलाक रद्द करण्याची हिंमत झाली. हजार वर्षांपासून प्रत्येक भारतीय हिंदू नागरिक पाहत होता, ते राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपली संपत्ती देशासाठी दान केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक रुपयाही आपल्या कुटुंबासाठी कमावला नाही. गेल्या २५ वर्षांपासून २४ तास देशसेवेसाठी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मोदीजींनी मेवा खाल्ला नाही तर जनतेची सेवा केली आहे. संपत्ती कमवून त्यांनी आपली घरे भरली नाहीत की मातोश्री टू बांधला नाही. सरकार आल्यानंतर कोणी मातोश्री टू बांधला होता, याचे उत्तर एकदा संजय राऊतांनी द्यावे, अशा शब्दात श्री. बन यांनी फटकारले.