मुंबई : नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. वर्षाला २ कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, १०० स्मार्ट सिटी बनवणार, विकास करणार अशा घोषणा दिल्या. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा,’ अशी राणाभीमदेवी थाटात गर्जना केली; पण मोदी फुसका बार निघाले. १२ वर्षांपासून देशात अक्षरशः लूट सुरू आहे. दोन गुजराती देश विकत आहेत, तर दोन गुजराती खरेदी करत आहेत. देशात जे सुरू आहे, तेच महाराष्ट्रातही सुरू आहे. ‘बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ भी सुभानअल्ला,’ अशी परिस्थिती आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या न्याय सत्याग्रह आंदोलनाला उपस्थिती लावून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी युवक काँग्रेसच्या कामाचे कौतुक केले. या संघर्षात युवक काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली.
यावेळी ते म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश आहे; पण भाजपाच्या राजवटीत देशातील अन्नदाता देशोधडीला लागला आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली नाहीत. शेतमालाला दुप्पट भाव तर मिळत नाहीच; उलट शेतीसाठी लागणारा खर्च मात्र दुप्पट-तिप्पट वाढला आहे. नरेंद्र मोदींनी दबावाखाली अमेरिकेशी व्यापार करार केला असून ट्रम्पच्या धमकीला मोदी घाबरतात. या करारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशातील तरुण, कामगार, कष्टकरी, शेतकरी—सर्वांची नरेंद्र मोदी यांनी फसवणूक केली आहे. विकासाचा दावा करणारे मोदी सरकार देशाला विनाशाकडे घेऊन जात आहे.
पुलवामा अतिरेकी हल्ल्यात आपले जवान शहीद झाले. या हल्ल्यात वापरलेले ३०० किलो आरडीएक्स कुठून आले, याचा अद्याप तपास लागलेला नाही. पहलगावमध्ये सीमेपासून ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी २६ लोकांची हत्या केली; पण आजही हे अतिरेकी मोदी सरकारला सापडले नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सैन्य दमदार कामगिरी करत असताना डोनाल्ड ट्रम्पने एक फोन केला आणि नरेंद्र मोदी सरेंडर झाले. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले आणि शिमला करार केला; पण नरेंद्र मोदी मात्र अमेरिकेसमोर झुकले आहेत. अमेरिका सांगते तसे त्यांना करावे लागते. देशाचा स्वाभिमान मोदींनी गहाण ठेवला आहे. भारत-पाकिस्तान प्रश्नावर आता डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करतात. आपल्या पंतप्रधानांना ‘सरेंडर’ म्हणावे लागते, हे दुर्दैवी आहे, असे सपकाळ म्हणाले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात संविधान, लोकशाही व संस्कृती वाचवण्याची लढाई सुरू आहे. जुलूम व अन्यायाच्या विरोधात काँग्रेसचा हा लढा सुरूच राहणार आहे. देश वाचवण्याची ही लढाई म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाईच असून आपण सर्व मिळून ही लढाई लढू व विजयी होऊ, असा आत्मविश्वासही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, शाह आलम शेख, मुंबई युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
