मुंबई : महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, यासंदर्भातील विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन सकारात्मक वातावरणात पार पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यंदाचे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून जाहीर केले असल्याचे सुनेत्रा अजितदादा पवार म्हणाल्या.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात येत असलेला चहापान कार्यक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संवादाचे प्रभावी माध्यम आहे. लोकशाहीमध्ये संवादाला महत्त्व असून, संवादातूनच प्रश्न सुटतात, यावर आपला विश्वास असल्याचेही सुनेत्रा अजितदादा पवार यांनी सांगितले.

विधिमंडळ हे जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि आकांक्षा मांडण्याचे सर्वोच्च व्यासपीठ असून, अधिवेशनात जनहिताचे विषय, विकासकामे आणि राज्याच्या प्रगतीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.