दापोली : दापोली शहरातील स्ट्रीट फूड विक्रेते तसेच हॉटेल व अन्य खाद्य व्यवसायिकांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण (Food Safety Training and Certification) प्रशिक्षण कार्यक्रम काल शनिवारी (२२ ऑगस्ट) सेवाव्रती शिंदे सभागृह येथे उत्साहात पार पडला. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सुरक्षित अन्न हाताळणीबाबत व्यावसायिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्य मंत्री तथा दापोलीचे आमदार .योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी अन्न व्यवसायामध्ये स्वच्छता, अन्न सुरक्षा मानके आणि सुरक्षित अन्न हाताळणीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा व्यावसायिकांनी आपल्या दैनंदिन व्यवसायात प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास अन्न व औषधं प्रशासन विभागाचे सहआयुक्त डॉ. सचिन जाधव, सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, ,Nestlé Indiaचे संजय भंडारी, NASVI Food Safety Trainer गुरुनाथ सावंत, संकेत कोनेरी तसेच Food Safety Officer भाग्यश्री परदेशी हे उपस्थित होते.
प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षक गुरुनाथ सावंत यांनी अन्न स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, वैयक्तिक स्वच्छता, व्यवसायाच्या परिसराची स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात दापोली तालुक्यातील तब्बल ८०८ अन्न विक्रेते व खाद्य व्यवसायिकांनी सहभाग घेतला. सुरक्षित व स्वच्छ पद्धतीने अन्न व्यवसाय करण्यासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन सहभागी व्यावसायिकांना देण्यात आले.
नोंदणी व नियोजनासाठी विशेष सहकार्य
प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी सचिन तोडणकर, मंगेश मोरे, दिनेश नाईक आणि बाळासाहेब नकाते यांनी विशेष मेहनत घेतली. जास्तीत जास्त अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नोंदणीपासून प्रशिक्षणाच्या नियोजनापर्यंत त्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. पूर्वनियोजित नोंदणी प्रक्रियेमुळे मोठ्या संख्येने व्यावसायिकांना या उपक्रमात सहभागी होता आले.
Nestlé Indiaकडून मोफत किचन किट
प्रशिक्षणात सहभागी झालेल्या अन्न व्यवसायिकांना Nestlé Indiaच्या वतीने मोफत किचन किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये अन्न व्यवसायात स्वच्छता व सुरक्षितता राखण्यासाठी उपयुक्त साहित्य, तसेच किचन कॅप आदी वस्तूंचा समावेश होता.
दापोली शहरातील स्ट्रीट फूड विक्रेते आणि छोट्या खाद्य व्यवसायांमध्ये स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार अन्न पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. या उपक्रमामुळे अन्न व्यवसायिकांमध्ये अन्न सुरक्षेबाबत जागरूकता वाढून नागरिकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्न उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.