मुंबई : अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अन्नत्याग उपोषणाची घोषणा केली आहे. ही घोषणा शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी आणि प्रसिद्धीसाठी असल्याची टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.
फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली असून राज्यातील सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या कर्जमाफीची एकूण रक्कम ३६ हजार कोटी रुपये असून लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
शेतकरी वर्गातून या निर्णयाचे स्वागत होत असताना केवळ सत्ताधाऱ्यांविरोधात भ्रम निर्माण करण्यासाठी आणि राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी रोहित पवार आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पंढरपूरमध्ये आधीच भाविकांची मोठी गर्दी असताना अशा आंदोलनामुळे प्रशासनावर ताण येऊन वारकरी आणि भाविकांना त्रास होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
पांडुरंगाच्या दारात राजकारण करण्याऐवजी भाविकांच्या श्रद्धेचा आदर राखावा, अशी अपेक्षा व्यक्त करत राम कुलकर्णी यांनी रोहित पवारांच्या भूमिकेचा समाचार घेतला.