मुंबई : राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ दादर येथील श्री संत सेना सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मधुकर भिवा तोरस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सभासदांसाठी १० टक्के लाभांश (Dividend) जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे माजी अध्यक्ष रत्नाकर रायकर साहेब, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर साहेब, कुणबी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष अवधूत तोरस्कर साहेब, कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका राजापूरचे सचिव अनिल भोवड साहेब, पतसंस्थेचे सल्लागार तुकाराम मोंडे साहेब, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष दीपक इंगळे साहेब, माजी उपाध्यक्ष सौ. मीनाक्षी डोंगरकर मॅडम, पतसंस्थेचे माजी सचिव चंद्रकांत सोगम साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) प्रभाकर वारीक साहेब तसेच विद्यमान संचालक मंडळ, समन्वय समिती कार्यकर्ते, नवनिर्वाचित तक्रार निवारण समिती अध्यक्ष चंद्रकांत लिगम साहेब,कुणबी युवक मंडळ राजापूर चे पदाधिकारी, कार्यकर्ते, कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका राजापूर चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पतसंस्थेचे सभासद बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर वारीक यांनी सभेपुढील विषय मांडले. त्यानंतर सर्व विषयांवरील ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत बावकर साहेब यांनी सांगितले की, “नवीन संचालक मंडळ बोर्ड वर आल्यानंतर संस्थेची प्रगती उल्लेखनीय झाली असून संस्थेची वाटचाल अधिक सक्षम होत आहे.” त्यांनी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात श्री.मधुकर भिवा तोरस्कर साहेब यांनी संस्थेची आर्थिक स्थिती, वर्षभरातील प्रगती आणि भविष्यातील उद्दिष्टांचा आढावा घेतला. “सभासद, ठेवीदार आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे संस्था अधिक सक्षम होत असून आगामी काळातही ही प्रगती कायम ठेवण्याचा आमचा निर्धार आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेला झालेल्या नफ्यातून सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली.
या प्रसंगी शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सभासदांचा पाल्यांचा गुणवंत विद्यार्थी सन्मानपत्र, बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी सभासद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. परशुराम जयराम परवडे साहेब यांनी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, संचालक मंडळ, सल्लागार, सभासद, ठेवीदार, सहकार निबंधक, लेखापरीक्षक, बँकर्स, माजी पदाधिकारी, समन्वय समितीचे कार्यकर्ते तसेच पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता झाल्याचे त्यांनी जाहीर केले.
