मुंबई : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोकण रेल्वेने सर्वसमावेशक मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्यात येणार असून, रेल्वे वाहतुकीत अतिरिक्त खबरदारी घेण्यात येणार आहे. मान्सून काळात रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. याअंतर्गत वीर ते कणकवली या विभागात रेल्वेगाड्यांचा कमाल वेग ताशी ७५ किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे. सामान्य परिस्थितीत याच मार्गावर गाड्या ताशी १२० किलोमीटर वेगाने धावतात.

तसेच, कणकवली ते उडुपी या विभागात रेल्वेगाड्या ताशी ९० किलोमीटर वेगाने चालविण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.मान्सूनदरम्यान रेल्वेमार्गांची सातत्याने पाहणी करण्यासाठी सुमारे ७०० कर्मचाऱ्यांची चोवीस तास नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी रेल्वे रुळांवर नियमित देखरेख ठेवली जाणार असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय, प्रत्येक एक ते दोन किलोमीटर अंतरावर आपत्कालीन दूरध्वनी यंत्रणा उभारण्यात आली आहे. या सुविधेमुळे गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष तसेच जवळच्या रेल्वे स्थानकाशी तत्काळ संपर्क साधता येणार असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित निर्णय घेणे शक्य होणार आहे.आव्हानात्मक मान्सून परिस्थितीतही प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि अखंड प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.