मुंबई : जनाब संजय राऊत, हिंदुत्वाचे शिवधनुष्य तुम्हाला पेलवणार नाही. तुम्ही आता औरंगजेब फॅन क्लब चालवणाऱ्या राहुल गांधी, काँग्रेसच्या शेजारी जाऊन बसल्याने धनुष्यबाण पेलण्याची औकात तुमच्या पक्षाकडे नाही. धनुष्यबाण गोठवणे म्हणजे हिंदुत्व आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गोठवणे. दुर्दैवाने 2019 पासून हिंदुत्वाचे विचार गोठवण्याचे काम उबाठा गटाच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळेच झालेला तुमच्या पक्षाचा बचत गट वाचवण्याचा प्रयत्न करा, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
युती म्हणून तुम्ही 2019 ला निवडणूक लढली. युतीला मतदारांनी कौल देऊनही उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर 2024 ला महाराष्ट्रातल्या जनतेने तुमचा मुद्देमाल जप्त करत हे शिवधनुष्य खऱ्या शिवसेनेला, एकनाथजी शिंदे यांना दिले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वाभिमानाचे धनुष्यबाण घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींशेजारी जाऊन बसणार आहात का? तुम्ही हा धनुष्यबाण हाती घेऊन सोनिया गांधींना मुजरा करणार आहात का?, अशा प्रश्नांची सरबत्ती श्री. बन यांनी केली.
श्री. बन पुढे म्हणाले, धनुष्यबाण घराघरात पोहोचवण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नव्हे तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, एकनाथजी शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण घराघरात पोहोचवत शिवसेना वाढवण्याचे काम केले. तीच शिवसेना पुन्हा एकदा वाढवण्याचे काम एकनाथ शिंदे करताहेत तर तुम्ही मात्र काँग्रेसचे विचार वाढवण्याचा प्रयत्न करताहात.
मराठा समाजाच्या मूक मोर्चा आंदोलनाबाबत अश्लील टिप्पणी करणाऱ्या संजय राऊत यांना मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्वाधिक मागण्या मान्य करण्याचे काम देवाभाऊंनी केले आणि हे सरकार मराठा बांधवांच्या पाठीशी आहे. त्यावेळीच घरात न बसता उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवले असते तर आज मनोज जरांगे पाटील किंवा मराठा बांधवांना रस्त्यावर उतरायची वेळच आली नसती. 2017 ला मराठा बांधवांना आरक्षण देण्याचे काम देवाभाऊंनी केले आणि ते घालवण्याचे पाप उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना झाले, अशी टीका श्री. बन यांनी केली.

‘लव्ह जिहाद’ साठी गरब्याचा वापर करण्यास विरो ध
गरबा, नवरात्र उत्सव हे हिंदूंचे सण आहेत आणि या हिंदूंच्या सणांमध्ये फक्त हिंदू लोकांनीच सहभागी झाले पाहिजे, असा आग्रह गेल्या काही दिवसांपासून धरला जातो आहे. मुळामध्ये गरबा, नवरात्रोत्सव या हिंदूंच्या सणांमध्ये अन्य धर्मियांनी येण्यास विरोध करायचा का नाही, याबद्दल मतमतांतरे आहेत. परंतु ज्या पद्धतीने गरबा, नवरात्रोत्सवात येऊन लव्ह जिहाद केला जातो त्याला विरोध आहे. या लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू माता-भगिनींवर नजर ठेवणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी नियम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी कार्यकर्ते करताहेत. लव्ह जिहादसारखा अजेंडा राबवण्यासाठी आणि हिंदू मुली-भगिनींना पळवण्यासाठी कोणी गरब्यामध्ये येत असेल तर निश्चितपणे त्याला विरोध केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असे श्री. बन यांनी स्पष्ट केले