मुंबई : दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या x हँडलवरून म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या सामाजिक न्यायाच्या विरोधात जाऊनही, आपले वर्चस्व टिकवण्यासाठी आणि सामाजिक जातीव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी ते निर्लज्जपणे आपली ‘उच्च जातीय’ ओळख पुढे आणत आहेत. कालच्या या प्रकारातून तोच ‘राष्ट्रविरोधी’ धोका उघड झाला आहे, ज्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेतील आपल्या समारोपाच्या भाषणात इशारा दिला होता.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती विषयक वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले की, बाबासाहेब म्हणाले होते की, जाती या मुळातच राष्ट्रविरोधी आहेत, कारण त्या सामाजिक जीवनाचे तुकडे करतात. विभाजनाला संस्थात्मक स्वरूप देतात आणि समाजांमध्ये मत्सर व द्वेषाचे एक अविरत चक्र निर्माण करतात.

काल, जेव्हा लोक ‘उच्च जातीय’ ओळख आणि राजकीय घोषणांच्या आडून उघडपणे आणि अभिमानाने मोर्चे काढत होते, तेव्हा ते याच राष्ट्रविरोधी विभाजनाचा सक्रियपणे सराव करत होते, असे ॲड. आंबेडकरांनी म्हटले.

त्यांनी आपला उच्च जातीय अभिमान आणि वर्चस्व हे, खऱ्या बंधुत्वाला अशक्य करणाऱ्या जातीव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी एक शस्त्र म्हणून वापरले …जर आपल्याला खरोखरच एक राष्ट्र बनायचे असेल तर..राष्ट्र असेल तरच बंधुत्व प्रत्यक्षात येऊ शकते. बंधुत्वाशिवाय, समानता आणि स्वातंत्र्य हे केवळ एका रंगाच्या छटेपेक्षा अधिक काही राहणार नसल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.

बंधुत्व या संविधानिक तत्वाचे महत्व सांगत ॲड. आंबेडकरांनी सांगितले की, बाबासाहेबांसाठी, राष्ट्र उभारणी केवळ राजकीय किंवा घटनात्मक स्तरावरच नव्हे, तर सामाजिक आणि मानसिक स्तरावरही आवश्यक होती. आणि यासाठी बंधुत्व आवश्यक होते. इथेच त्यांचे बंधुत्वावरील विधान अत्यंत महत्त्वाचे ठरते. बंधुत्वाशिवाय समानता टिकू शकत नाही. जर तथाकथित उच्च जाती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासलेल्या वर्गांसाठीच्या सामाजिक न्यायाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी आपल्या जातीय विशेषाधिकारांचा बहाणा म्हणून वापर करत असतील, तर कोणताही समाज बंधुत्व साधल्याचा दावा करू शकत नाही. जेव्हा वंचित आणि शोषित समाजांची प्रगती ही तथाकथित उच्च जातींच्या वर्चस्वावरील थेट हल्ला म्हणून पाहिली जाते, तेव्हा खरी लोकशाही कोसळते.जोपर्यंत बंधुभाव ही एक जिवंत सामाजिक वास्तविकता बनत नाही, तोपर्यंत समानता आणि स्वातंत्र्य हे केवळ एक वरवरचे ‘रंगकाम’ आहे, जे सामाजिक न्यायाला पहिले आव्हान मिळताच कोसळून पडते.

हे आंदोलन आरएसएस-भाजपने राजकीयदृष्ट्या घडवून आणले होते, यात मला शंका नाही. पण काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आहे. जेव्हा सामाजिक न्यायाच्या विरोधात उच्च जातीय अस्मितेचा इतक्या उघडपणे वापर केला जातो, तेव्हा मौन म्हणजे यात सामील असण्याचाच संकेत आहे. अशी शंकाही ॲड. आंबेडकरांनी काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेवर व्यक्त केली.