रत्नागिरी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘हापूस’ आणि ‘केसर’ आंब्याने जागतिक बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, गेल्या तीन वर्षांत राज्यातून परदेशात आंब्याची विक्रमी निर्यात झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून एकूण ६७,२५२ मेट्रिक टन आंब्याची परदेशात निर्यात करण्यात आली आहे. यात कोकणचा राजा समजला जाणारा हापूस आणि मराठवाडा तसेच इतर भागांतील चवदार केसर आंब्याला परदेशी ग्राहकांकडून प्रचंड मागणी मिळाल्याचे दिसून येत आहे.

या विक्रमी निर्यातीमागे राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि शासनाचे कृषी विभाग यांचे सामूहिक प्रयत्न कारणीभूत आहेत. जागतिक बाजारपेठेतील कडक मानके पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि कीड नियंत्रणाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा, जसे की व्हेपर हीट ट्रीटमेंट आणि इरेडिएशन सुविधांमुळे आंब्याचा दर्जा टिकवून ठेवणे सोपे झाले. यामुळे परदेशात भारतीय आंबा खराब न होता सुरक्षितपणे पोहोचू शकला.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून हापूसची, तर लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागांतून केसर आंब्याची मोठी निर्यात झाली आहे. या विक्रमी निर्यातीमुळे महाराष्ट्रातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगला भाव मिळाला असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी भर पडली आहे. जागतिक बाजारात ‘ब्रँड महाराष्ट्र’ची ओळख निर्माण झाल्यामुळे येत्या काळात ही निर्यात आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.