मुंबई : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी संतप्त असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाबाबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गरज नाही, विद्यार्थीच दहशतवादी आहेत,” असे केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून ते सत्तेच्या अहंकाराचे प्रतीक आहे. सदाभाऊ खोत हे आता ‘सदाभाऊ’ नसून ‘गुंडाभाऊ’ झाले आहेत. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले, ‘सदाभाऊ ते गुंडाभाऊ’ हा प्रवास तुम्ही इतक्या लवकर पूर्ण कराल, असे कधी वाटले नव्हते. पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आपल्या भूमिकेलाच तुम्ही तिलांजली दिली आहे. आज शिक्षणाच्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांनाच तुम्ही गुंड आणि दहशतवादी म्हणत आहात. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, अशी भूमिका घेत आहात. दुसऱ्यांच्या मुलांवर लाठ्या-काठ्यांचा मारा होत असताना त्याचे समर्थन करून मंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न करणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.

आम्ही पाहिलेले सदाभाऊ आणि आजचे ‘गुंडाभाऊ’ यांच्यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणे हा त्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या संघर्षाचा आणि घटनात्मक अधिकारांचा अवमान आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल देशातील विद्यार्थ्यांची बिनशर्त जाहीर माफी मागावी असे लोंढे म्हणाले.