मुंबई : तब्बल सहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला. आशाताईंच्या जाण्यानं सूरही गहिवरलेत. तर, शब्दही हिरमुसलेत. फक्त सिनेसृष्टीच नाहीतर, अख्खा देश शोकसागरात बुडालाय.
संपूर्ण देशानं साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला. दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका आशाताईंच्या पार्थिवावर आज (१३ एप्रिल २०२६) रोजी दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल सहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला. आशाताईंच्या जाण्यानं सूरही गहिवरलेत. तर, शब्दही हिरमुसलेत. फक्त सिनेसृष्टीच नाहीतर, अख्खा देश शोकसागरात बुडालाय. आशा भोसले यांचं जाणं हा संपूर्ण देशासाठी धक्का आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी १२ एप्रिलला वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आज (१३ एप्रिल २०२६) सकाळी अकरा वाजता आशा भोसले यांच्या लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं. आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गजांनी उपस्थिती लावलेली.
सिनेसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा आणि भय्याजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, राज्यपाल जिष्णू देव शर्मा, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसंच विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
कलाकारांनी आपल्या लाडक्या ‘आशा ताईं’ना त्यांच्याच गाण्यांच्या सुरांनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यविधीच्या वेळी वातावरण अत्यंत शोकाकुल होते. अशा वेळी शब्दांपेक्षा सुरांनीच भावनांना वाट करून दिली. ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांनी आशा ताईंसोबत अनेक दशके काम केले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी आशा ताईंच्या आठवणीत “यहा कल क्या हो किसने जाना” हे अजरामर गाणे गायले. हे गाणे गाताना त्यांचा आवाजही गहिवरला होता, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. भजन सम्राट अनुप जलोटा यांनी देखील आपल्या खास शैलीत गाणे सादर करत आशा ताईंच्या सांगीतिक वारशाला वंदन केले. लोकप्रिय गायक शान यानेही आपल्या भावना सुरांच्या माध्यमातून मांडल्या.
