मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), मुंबईच्या वतीने आज सांताक्रूझ (पूर्व) येथील ‘पब्लिक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’मध्ये भव्य विद्यार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम भाजप मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

राष्ट्रभक्त डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष अधिवेशनात त्यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर आणि जनहितासाठी केलेल्या कार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय परंपरेनुसार दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदना यांसह अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात झाली. यावेळी भाजप मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी, मुंबईतील विविध भागांतून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले युवक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भाजप मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच आधुनिक काळातील डिजिटल शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते आचार्य पवन त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी हे केवळ राजकारणी नव्हते, तर भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान होते. ‘एक देशात दोन निशाण, दोन विधान आणि दोन प्रधान चालणार नाहीत’ हा निर्धार त्यांनी देशासमोर मांडला आणि अखंड भारताची संकल्पना अधिक बळकट केली. आज जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आले असून, देशाची राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ झाली आहे. डॉ. मुखर्जी यांच्या ऐतिहासिक संघर्षाला हीच खरी आदरांजली आहे. या विद्यार्थी संमेलनाच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्याचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांचे जीवन आणि भाजयुमो मुंबईचा हा प्रयत्न प्रत्येक तरुणाला राष्ट्रहित सर्वोच्च असल्याची प्रेरणा देतो.”