मुंबई : दिल्लीत आरक्षणा विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे मूळ स्वरूप आणि त्यामागील मानसिकतेवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “आरक्षण हटाओ आंदोलन = जातिवादी मिलन समारोह! आप इस जातिवाद के नंगे प्रदर्शन को क्या कहेंगे?” अशा कडक शब्दांत ट्विट करत ॲड. आंबेडकरांनी या आंदोलनाचा खरा मुखवटा गळून पडल्याचे दाखवले.
देशात एका बाजूला सामाजिक न्यायाचे प्रतीक असणाऱ्या आरक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी ‘आरक्षण हटाओ’ आंदोलन चालवले जात आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान काही विकृत व जातीवादी मानसिकतेच्या तरुणांनी उघडपणे जातिवादाचे प्रदर्शन मांडल्याचे समोर आले आहे. या आंदोलनात तरुणांच्या एका गटाने “ब्राह्मणवाद जिंदाबाद”, “ठाकूरवाद जिंदाबाद” अशा विशिष्ट जातींचे उदात्तीकरण करणाऱ्या घोषणा दिल्या.
भारतीय राज्यघटनेने मागास, वंचित आणि शोषित घटकांना सन्मानाने जगण्यासाठी आणि प्रतिनिधित्वासाठी आरक्षण ही सामाजिक न्यायाची संकल्पना दिली आहे. परंतु, आरक्षणाला विरोध करण्याच्या नावाखाली अशा प्रकारे विशिष्ट जातींचा हुंकार भरणे आणि घोषणाबाजी करणे, यावरून हे आंदोलन केवळ आरक्षणाविरोधात नसून ते जातीव्यवस्था बळकट करण्यासाठीचा ‘जातीवादी मेळावा’ बनले आहे, असा आरोप आता सर्वस्तरातून होत आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
